Panchkarma
The technique and methods of pancha-karma treatment are deeply rooted in the ancient texts of Ayurveda, like Charak and Sushrut Samhita. They have been recorded in these texts around 1500 B.C., nearly 5000 yrs ago. Panch-karma properly speaking, is not a singular noun denoting a particular thing or a standard treatment sequence. Rather it describes five therapeutic procedures used to eradicate the increased excessive dosha’s (Vata, Pitta,Kapha) from the body which in turn restore the health. Ideally the procedures should be undergone by healthy person also during the normal seasons with no extreme heat -cold or heavy raining.
पंचकर्माचा उद्देश
1. दोषांना आजार निर्माण करण्यापूर्वी बाहेर काढले जाते. त्याने आरोग्य व शरीराची ताकद टिकून राहते.
2. शरीराचा दर्जा चांगला राहिल्यामुळे वार्धक्य लवकर येत नाही तसेच निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होते. शरीरातील दोषांची स्थिती सम म्हणजेच कार्यक्षम राहण्यास योग्य बनविली जाते. त्यामुळे विविध आजार बरे करण्यासाठी पंचकर्म अतिशय उपयुक्त ठरते. थोडक्यात अविरत काम करणा-या शरीराची वेळेतच ‘सर्व्हिसिंग’ करण्याचे काम पंचकर्म चिकित्सा करते.
‘पंचकर्म’ ही एक शुध्द आयुर्वेद चिकित्सा पध्दती आहे. सध्या पंचकर्म या शब्दाला व्यावसायिकता जास्त आली आहे. शिरोधारा, मसाज व मसाजचे विविध प्रकार म्हणजे पंचकर्म नव्हेत. काही कारणांमुळे अशी धादांत खोटी गोष्ट भिन्न भिन्न जाहिरातींमुळे समाजात रुढ झालेली दिसते. मसाजिस्टकडून अंग चोळून घेणे, भरपूर तेल वापरून मसाज करणे, शिरोधारा, भाताच्या पिंडाने शेकणे इ. प्रकार म्हणजे पंचकर्म नव्हेत. आयुर्वेदातील स्नेहन – स्वेदन या पंचकर्माच्या पूर्वी करण्यात येणाऱ्या काही चिकित्सा आहेत. त्यातही केरळ किंवा इतरत्र पारंपारिक उपचार पध्दती आहेत. त्यांना पंचकर्म नक्कीच म्हणता येणार नाही. त्यांचा एका भिन्न पध्दतीनं उपचारांसाठी वापर करता येतो. पंचकर्म करत असतांना काही विशिष्ट नियम पाळावे लागतात. ही कर्मे ‘Physiological operations’ च असतात. त्यासाठी कांही पूर्व व नंतर करण्याचे उपचार निश्चित केलेली असतात. पंचकर्म ज्याच्यावर करावयाचे त्याची योग्य तपासणीही महत्वाची असते. रुग्ण तपासणी करुन मगच पंचकर्म चिकित्सा ठरवली जाते. स्वस्थ व्यक्ती तसेच रोग्यामध्ये पंचकर्म उपचार, रोगाची व शरीराची अवस्था पाहून योग्य पध्दतीने करता येतात. स्वास्थ्यासाठी ही फलणारी गुंतवणूक तर रोग्याला रोगापासून होणारी ही सोडवणूक आहे. आपण यापुढे प्रत्येक कर्माची विस्तृत माहिती जाणून घेऊ. पंचकर्म उपचार म्हणजे नक्की काय याची सर्वसामान्यांना ही माहिती व्हावी व चूकीच्या प्रसाराला खिळ बसावी असा उद्देश सफल होवो. हिच गुरु व धन्वंतरी चरणी प्रार्थना !
पंचकर्म पूर्व तयारी
पंचकर्म करण्यापूर्वी शरीराची स्थिती व ताकद योग्य करणे यासाठी काही पंचकर्म पूर्व उपचार करावे लागतात. त्यात –
1. स्नेहन (शरीर स्निग्ध करणे.) व
2. स्वेदन (वाफ देवून किंवा अन्य पध्दतीने शरीरास घाम आणून दोष मोकळे करणे.)
असे दोन पूर्व कर्म करावे लागतात. ते योग्य पध्दतीने झाल्यावरच पंचकर्माच्या उपचारांना यश मिळते.
स्नेहन
स्नेहन उपचारात भिन्न भिन्न पध्दतीच्या स्निग्ध पदार्थांचा वापर केला जातो. तरीही प्राधान्याने तेल व तूपाचा वापर यात होतो. स्नेहन उपचाराचे बाह्य व आभ्यंतर असे दोन प्रकार पडतात. प्रथम आपण आभ्यंतर स्नेहपान अर्थात् पोटातून घेण्याच्या स्नेहाच्या प्रकाराविषयी पाहू. हा शोधन, शमन आणि बृहंण अशा तीन प्रकारचा सांगितला आहे.
येथे आपण फक्त पंचकर्मासाठीचे (शोधन) स्नेहपान पाहू.
– पंचकर्म चिकित्सेच्या अगोदर शरीराला स्निग्ध, सक्षम बनवणे आवश्यक असते. शरीरातील बिघडलेले तसेच वाढलेले दोष उलटी किंवा जुलाबाच्या औषधाने सहजगत्या शरीरातून बाहेर पडावेत अशी परिस्थिती निर्माण करणे आवश्यक असते. पंचकर्मासाठीचे (शोधन) स्नेहपान शरीरातील दोष बाहेर काढण्याच्या उद्देशाने विशेषतः वमन आणि विरेचनाच्या अगोदर शरीरातील चलनवलनाचे रस्ते (स्रोतसे Channels), कोठा, आतडे हे सर्व स्निग्ध होण्यासाठी व रस, रक्त इ. धातुंमध्ये भिनले गेलेले दोष सूटे होण्यासाठी दिला जातो. यासाठी तूप किंवा तेल पिण्यास दिले जाते. रुग्णाचा कोठा, स्नेह पचविण्याची शक्ती पाहून या तेल-तूपाचे प्रमाण ठरविले जाते. तसेच आजाराचे स्वरूप, हवामान -ऋतु पाहून औषधी तूप किंवा तेल वापरले जाते. रात्रीचे जेवण पचल्यावर दुस-या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर रिकाम्यापोटी हा स्नेह (तेल, तूप ) घ्यायचा असतो. स्नेह पूर्ण पचून नंतर चांगली भूक लागेपर्यंत काहीही खायचे नसते. शरीरातील सर्व भागांमध्ये स्नेहन झाले आहे हे वैद्याने परीक्षण करून ठरवले जाते. तोपर्यंत स्नेह प्रायः वाढत्या क्रमाने (३०-६०-९०..मिली असा) दिला जातो. लहान मात्रेपासून सुरु करुन क्रमाने हळूहळू वाढवत मोठ्या मात्रेमध्ये द्यावा लागतो. त्यामुळे अतिशय सावधगिरीने, अजीर्ण होणार नाही अशा बेताने दिला जातो. स्नेहन पूर्ण झाल्याची लक्षणे ३ ते ७ दिवसात दिसू लागतात. या प्रकारच्या स्नेहपानानंतर शरीरातील दोष बाहेर काढून टाकण्याचे (शोधन) उपचार करतात. स्नेहपाना दरम्यान पिण्यासाठी, शौचासाठी, चूळ भरण्यासाठी तसेच सर्व कामांसाठी नित्य गरम पाणी व अन्नच वापरावे. गारव्याने दोषांचा मार्ग पुनः अडकतो व त्याने वेगळे त्रास होतात. स्नेहपानासाठी वैद्यांकडून मिळालेल्या विस्तृत सूचनांचे तंतोतंत पालन करावे. ते अत्यंत आवश्यक आहे.
बाह्य स्नेहन

– शरीरास बाहेरुन तेल-तूप इ. लावणे म्हणजे बाह्य स्नेहन यालाच ‘अभ्यंग’ असे म्हणतात. अभ्यंग हा बाह्य स्नेहनाचा सर्वात अधिक प्रचलित प्रकार होय. तेल इ. स्नेह त्वचेतून त्वचेतील रोमकुपांतून शरीरात शोषले जातात. अभ्यंग स्वस्थ व्यक्तींमध्ये नित्य प्रशस्त आहे. अभ्यंगासाठी कोणताही स्नेह तेल, तूप इत्यादि किंवा त्यांचे मिश्रणही वापरु शकतो. पण वात कमी करणारे, स्वस्त, सुलभ व गुणकारी म्हणून तीळ तेलाचाच वापर जास्त केला जातो. ऋतुनुसार अनुकुल, वात-पित्त कमी करणा-या सुगंधी खोबरेल तेलाचा देखील नेहमी अभ्यंगासाठी वापर केला जातो. अभ्यंगास ‘मसाज थेरेपी’ म्हणून सध्या कमर्शिअल व्हॅल्यु आहे. कफाचे रोग, अजीर्ण, अपचन, जुलाब, उलट्या होत असतांना, ताप असेल तर अभ्यंग करु नये. अभ्यंग करताना डोक्यावर, तळपायांना तेल जरुर चोळावे व कानातही थोडे कोमट करून तेल घालावे. गरम हवामान असताना थंड गुणांच्या तेलाने (उदा. खोबरेल तेल) व थंड ऋतुमध्ये गरम गुणधर्माच्या तेलाने (उदा. तीळाचे तेल) अभ्यंग करावे. अंघोळीच्या अगोदर ५ मिनिटे रोज अभ्यंगाची सवय करावी. नित्य अभ्यंगाने अभ्यंगाचे सर्व फायदे मिळतात. अभ्यंगानंतर स्वेदन (शेक) घ्यावे किंवा गरम पाण्याने स्नान करावे. साबण लावू नये. उटण्याचा वापर करावा.
अभ्यंगाचे गुण –1. थकवा, ताण कमी होतो.
2. वाताचे त्रास कमी होतात.
3. झोप चांगली येते.
4. त्वचा मृदु व बलवान होते व रंग उजळतो.
5. कष्ट व आघात सहन करण्याची शक्ती येते.
6. दृष्टीचे (डोळ्याचे) बळ सुधारते.
7. म्हातारपण उशीरा येते व कार्यक्षम आयुष्य वाढते.
स्वेदन

ज्या प्रक्रियेने शरीरास घाम आणवला जातो त्याला ‘स्वेदन’ असे म्हणतात. स्वेदनाने शरीराचा आखडलेपणा, जडपणा व शैत्य (थंडपणा) दूर केले जाते. घाम येऊन गेल्यानंतर शरीर हलके होते व शरीरातील सर्व मार्ग मोकळे होतात.
स्वेदन किंवा शेक घेणे हा प्रकार घरगुती स्तरावर बरेचदा ऊन घेणे, शेकोटीचा शेक, तवा गरम करुन त्याने शेकणे किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे, गरम पाण्याच्या टबात बसून राहणे इ. ब-याच प्रकारांनी केला जातो. मात्र स्वेदन हे अभ्यंगाप्रमाणे नियमित करण्याची गोष्ट नव्हे.
स्वेदन ही देखील स्नेहनाप्रमाणे आयुर्वेदात स्वतंत्र व महत्वाची चिकित्सा आहे. तसेच पंचकर्मांमध्ये ‘पूर्वकर्म’ म्हणून स्वेदन केले जाते. स्नेहनामुळे पूर्वीच सूटे झालेले दोष स्वेदनामुळे मूळ प्रवाहात येवून कोठ्यात (पोटात) आणले जातात. जिथून नंतर त्यांना शोधन औषधांनी बाहेर काढले जाते.
पंचकर्मापूर्वी शरीरात जखडलेले, भिनलेले, चिकटलेले दोष सोडवून कोठयात आणण्यासाठी निष्क्रिय अवस्थेत राहून तसेच बाहेरून उष्णता वापरून घाम आणला जातो. वाताच्या आणि कफाच्या रोगामध्ये स्वतंत्र चिकित्सा उपचार म्हणूनही स्वेदन उपचार करतात.
बाह्य अग्नि वापरून करण्याच्या स्वेदामध्ये औषधांच्या पुरचुंडीने शेक देणे, नळीच्या सहाय्याने वाफेचा शेक देणे, अंगावर गरम पाण्याची धार सोडणे असे एकूण १३ प्रकार आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत. सध्या आयुर्वेदीय चिकित्सायलात आयताकृती पेटीत बसवून वा झोपवून वाफेने स्वेदन दिले जाते. स्वेदनाचा प्रकार, तीव्रता ही रोग, रोगी व तेव्हाचे हवामान पाहून ठरविली जाते, दूध, काढा, मटणसूप इ. ची वाफ सुध्दा स्वेदनासाठी वापरता येते.
आवश्यकतेनुसार स्नेहन न करता रुक्ष (कोरडे) स्वेदन सुध्दा देता येते. थंड ऋतुमध्ये स्वेदन अधिक प्रशस्त आहे. स्वेदनाचा काळ हा रुग्णाला चांगला घाम येईपर्यंत असा रुग्णाच्या ताकदीनुसारच द्यावा लागतो. सर्वसाधारणपणे चांगला घाम येण्यास १० ते १५ मिनिटांचा कालावधी लागतो.
स्वेदनाचे फायदे –1) वात व कफ दोष कमी होतात.
2) अंग हलके व मोकळे होते.
3) भूक वाढते.
4) घाम येवून त्वचा मृदू व प्रसन्न होते.
5) शरीरात स्फूर्ती येते, हलकेपणा येतो, अतिरिक्त मेद, स्थूलता कमी होते. आळस कमी होतो.
6) सांध्याच्या हालचाली सुधारतात.
7) जेवणावरची इच्छा, भूक सुधारते. वात सहज सरतो.
जास्त स्वेदन झाल्यास जास्त थकवा येतो, चक्कर येते तसेच त्वचेवर लाल पुरळ येतात. वैद्यकीय सल्ल्याखेरीज नियमित स्वेदन घेवू नये.
वमन

‘वमन’ या शब्दाचा अर्थ उलटी. ज्या उपचारात औषध देऊन उलटी करवली जाते त्याला वमन असे म्हणतात. आपण व्यवहारात अनेक लोक मीठाचे पाणी पिऊन अथवा तोंडात बोटे घालून सकाळी उलटी करताना पाहतो. पण याला पंचकर्मातील ‘वमन’ असे म्हणता येणार नाही.
वमन उपचाराची शास्त्रोक्त पध्दत व माहिती आपण पाहूया.
वमन प्रामुख्याने शरीरात अतिरिक्त वाढलेल्या व बिघडलेल्या कफदोषाकरिता दिले जाते. कफ व पित्त तोंडावाटे उलटीच्या साह्याने शरीराबाहेर निघून गेल्यामुळे शरीराची शुध्दी होते व त्यामुळे व्याधी कमी होतो. वमन चिकित्सा प्रामुख्याने सर्दी, खोकला, दमा, त्वचाविकार, अम्लपित्त, मेदोरोग, नागीण, मानसविकार, पचनाचे विकार, विविध अॅलर्जी इ. व्याधींसाठी लाभदायी ठरते. निरोगी व्यक्तींनी देखील वसंत ऋतुमध्ये म्हणजे साधारणतः फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये वमन घेतल्यास वर्षभरात कफामुळे होणारे विकार टाळता येतात.
वमन उपचार करण्याअगोदर संपूर्ण शरीराची तयारी करणे महत्वाचे असते. त्यासाठी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे स्नेहपान म्हणजे ३ ते ७ दिवसापर्यंत औषधी तूप अथवा तेल पिण्याकरिता दिले जाते. संपूर्ण शरीर स्निग्ध झाल्याची लक्षणे वैद्यांना दिसली की मग वमनासाठी शरीर तयार आहे असे समजले जाते. आजारास कारणीभूत असणारे दोष शरीराच्या सर्व मार्गातून सोडविले जाऊन ते दोष पातळ करुन कोठ्यात आणले जातात व वमनाच्या अर्थात उलटीच्या औषधाने ते दोष शरीराबाहेर काढले जातात.
वमनाच्या आदल्या दिवशी रात्री कफदोषाला वाढविणारा तसेच कफास मदत करणारा आहार घ्यायचा असतो. असा आहार पचल्यावर दुसऱ्या दिवशी दोषांना बाहेर पडण्यायोग्य स्थितीत आणतो. त्यामुळे प्रत्यक्ष वमन – उलटीचे औषध दिल्यावर दोष बाहेर पडणे सोपे जाते. मुग+उडीद+तीळ यांची खिचडी, दूध, तांदळाची खीर, केळी, दही असे पदार्थ योग्य प्रमाणात ठेवून जेवण द्यावे.
वमन चिकित्सा करण्याच्या दिवशी सुध्दा तेल लावून शेक दिला जातो. त्यानंतर औषधीद्रव्य मोठ्या प्रमाणात पिण्यास दिले जाते. साधारणपणे वमनात ५ ते ८ लिटरपर्यंत काढा/द्रवपदार्थ पिण्यास दिला जातो. औषधांचा काढा, ऊसाचा रस तसेच दूध यापैकी एक किंवा त्याचे मिश्रण पातळ पदार्थ पोटभर पिण्यास दिले जाते. त्यानंतर काही वेळात उलट्या होण्यास सूरवात होते. यामध्ये प्रथमतः कफ व त्यानंतर पित्त बाहेर पडते.
वमन चालू असताना आवश्यक तेवढा द्रवपदार्थ पोटात जाणे आवश्यक आहे. त्यामुळे मळमळ सुरु झाल्यावर देखील पुनः पुनः द्रवपदार्थ पिणे आवश्यक आहे. वमनामध्ये उलटी होताना विशेष त्रास जाणवत नाही. साधारण ७०-९० मिनिटांमध्ये उलटी थांबते. जोपर्यंत वैद्याला वमनप्रक्रिया पूर्ण झाल्याची लक्षणे दिसत नाहीत तोपर्यंत पुन्हा पुन्हा औषध पिण्यास दिले जाते. साधारणतः उलटीमध्ये जळजळीत, आंबट, तिखट, कडू चवीचे पित्त पडून गेल्यानंतर वमन थांबविले जाते. वमन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उलटी केलेल्या द्रव्याचे परीक्षण केले जाते. या परीक्षणावरुन व रुग्णाला जाणवणा-या लक्षणांवरुन वमन उपचार किती चांगला झाला याचे अनुमान करता येते.
वमन चांगले झाल्यानंतर रुग्णाला हलकेपणा जाणवतो. उलटी होणे आपोआपच थांबते. घसा, हृदय व छातीत हलकेपणा व मोकळेपणा वाटू लागतो. किंचित् अशक्तपणा जाणवतो.
वमन झाल्यानंतर नाकातोंडात शिल्लक राहिलेला कफ कमी करण्याकरिता औषधांचा धूर तोंडावाटे व नाकावाटे घेण्यास सांगितला जातो. त्याला धूमपान चिकित्सा असे म्हणतात. वमनोपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्णास विश्रांती दिली जाते. त्यानंतरचे साधारणतः ३ ते ५ दिवस पथ्यकर आहाराचा क्रम सांगितला जातो. वमनानंतर पचनशक्ती कमी झालेली असते. ती पूर्ववत् होण्याकरिता क्रमाक्रमाने हलक्या आहारापासून सुरुवात करुन नेहमीच्या आहारावर रुग्णास आणले जाते. याला संसर्जन क्रम असे म्हणतात.
निरोगी व्यक्तीने देखील वर्षभरात एकदा वसंत ऋतुत वमन करुन घ्यावे. वमन उपचार करताना नियम पाळले न गेल्यास वेगवेगळे उपद्रव होण्याची शक्यता असते त्यामुळे वमन उपचार हा तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घेणे आवश्यक आहे. वमन उपचार हा घरी करण्याचा नाही. योगशास्त्रातील ‘धौती’ क्रियेमध्येदेखील उलट्या करवल्या जातात. पण वमन उपचाराची त्याची तुलना करणे योग्य नाही. वमन उपचारात शरीरातील दोष मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्याचे व त्याच बरोबर संपूर्ण शरीराची शुध्दी करण्याचे सामर्थ्य आहे.
सर्व उपचारांमध्ये वमन उपचार हा रुग्णाच्या अखत्यारीतला आहे. म्हणजे औषधी काढा किंवा द्रवपदार्थ नियमित गतीने सलग पिणे हे रुग्णाचे सहकार्य या उपचारामध्ये अत्यावश्यक असते. ३-४ ग्लास द्रव पिल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते तेव्हा पुढचे औषध पोटात जाण्यानेच सहज व मोठी उलटी होते. असा हा वमन उपचार त्वरित फळ देणारा आहे.
वसंत ऋतुत दमा किंवा त्वचारोगाच्या पुनः पुनः होणाऱ्या त्रासासाठी तसेच स्वस्थ व्यक्तींमध्ये देखील केला जातो. वमन कर्म हे एक दुधारी शस्त्र आहे. त्याचे नियम पाळून वमन केल्यास त्याने उत्तम फल मिळते
विरेचन

‘विरेचन’ चिकित्सेत औषध देऊन जुलाबावाटे शरीरातील दोष काढले जातात. पण विरेचन चिकित्सेत केवळ पोट साफ करणे हा हेतु नसून शरीरातील व्याधी उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरणारे दोष शरीरातून काढून टाकून त्या व्याधींचा समूळ नाश करणे हा हेतु असतो.
विरेचन चिकित्सा प्रामुख्याने पित्तापासून होणा-या व्याधींसाठी दिली जाते. निरनिराळे त्वचाविकार (इसब, गजकर्ण, सोरियासिस, तारुण्यपिटिका इ.) कावीळ, दमा, मधुमेह, ताप, मूळव्याध, भगंदर, उदर (पोटात पाणी होणे) पक्षाघात, विविध पचनविकार तसेच वारंवार सूज येणे इ. व्याधीत विरेचन चिकित्सा उपयोगी पडते. कित्येक दिवस शरीराला चिकटून राहिलेले हे व्याधी विरेचन दिल्यानंतर झपाट्याने कमी झालेले दिसून येतात. व नवीनच झालेले व्याधीसुध्दा विरेचन उपचारानंतर लगेच कमी होतात व त्यांचा पुन्हा पुन्हा त्रास होत नाही.
साधारणतः विरेचन उपचार घेण्याअगोदर संपूर्ण शरीराची पूर्वतयारी करुन घेतली जाते. पूर्वी सांगितलेल्या स्नेहपान उपचाराप्रमाणे रुग्णाला प्रथम ३ ते ७ दिवसापर्यंत तेल किंवा तूप पिण्यास दिले जाते. यामुळे शरीर आतून व बाहेरुन स्निग्ध होते. त्यानंतर संपूर्ण अंगाला तेल लावून शेक दिला जातो. अशा प्रकारे स्नेहन व स्वेदन करुन झाल्यानंतर १ किंवा २ दिवसांनी विरेचनाकरिता औषध दिले जाते. स्नेहपान व विरेचनादरम्यान कफ वाढवणारे पदार्थ खाऊ नयेत. त्याने जूलाब नीट होत नाहीत किंवा उलटी होऊ शकते.
रुग्णाचे कोष्ठ (कोठा), बल, व्याधी, प्रकृती इ. घटकांचा विचार करुन विरेचनाचे औषध ठरवले जाते. ज्या व्यक्तींचा कोठा खूप हलका आहे अशा व्यक्तींना केवळ दूध, मनूका, ऊसाचा रस याने देखील जूलाब होतात. जड कोठ्याच्या लोकांना त्रिफळा चूर्णानेही काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच विरेचन औषधे घ्यावी. वैद्यकीय गरजेनुसार रुग्णाला एक -दोन दिवस प्रवेशित करून विरेचनाचा उपचार करावा लागतो.
विरेचन घेण्याच्या दिवशी ८ ते ९ वाजता शौच व स्नानानंतर फोडणी दिलेले मुगाचे कढण किंवा टोमॅटो सार-भात किंवा फोडणी दिलेले मटणसूप असे स्निग्ध, उष्ण व द्रव आहार थोड्या प्रमाणात द्यावेत. यानंतर दोनअडीच तासांनी विरेचनाचे औषध घ्यावे. विरेचनाचे औषध घेतल्यानंतर ५ – १० किंवा अधिकही जुलाब होतात. त्यामध्ये क्रमशः पित्त व कफ पडतो. त्यानंतर जुलाब आपोआप थांबतात.
विरेचन औषध दिल्यावर पोटात दुखणे, मलमळणे तसेच क्वचित् उलटी देखील होऊ शकते. त्यामुळे रुग्णाने घाबरुन जाऊ नये. सर्व शरीरातील दोष पोटात उतरल्यावर ते त्याच्या जवळच्या मार्गाने बाहेर पडतात. त्यामुळे आमाशयात (पोटाच्या वरच्या भागात) दोष आले तर ते तोंडावाटे उलटीद्वारे बाहेर पडतात. विरेचन औषधाने पोटात मुरडा झाला, दुखू लागले तर गरम पाण्याच्या पिशवीने पोट शेकावे. गार वा-यात बसू नये. प्रत्येक जुलाबानंतर थोडे घोट घोट पाणी प्यावे. विरेचनाचे औषध घेतल्यावर काहीही खाऊ नये किंवा झोपून जाऊ नये. तसे केल्यास विविध त्रास होतात. क्वचित वेळेस रुग्ण विरेचनाचे औषध पूर्ण पचवून टाकतो व त्यास फारसे जुलाब होतच नाहीत. अशा वेळेस दुसऱ्या दिवशी पुनः विरेचनाचे औषध द्यावे लागते.
विरेचनाच्या दिवशी रुग्णाने गरम पाणीच पिण्याकरिता व शौचविधी इ. करिता वापरण्यास घ्यावे. विरेचनाचे औषध घेतल्यानंतर ते योग्य प्रकारे लागू पडले का नाही हे पाहणे महत्वाचे ठरते. विरेचनात शरीरातील दोष बाहेर निघून गेल्यामुळे पोट व संपूर्ण शरीर हलके वाटते. उत्साह वाढतो. व्याधीती लक्षणे कमी होतात. विरेचन झाल्यानंतर थोडा थकवा जाणवतो. त्यानंतर विरेचन कशाप्रकारे झाले आहे त्यानुसार क्रमशः हलक्या आहारापासून (पेज, सूप इ.) नेहमीच्या आहारावर रुग्णाला आणले जाते.
विरेचन उपचारात रुग्णाला योग्यप्रकारे विरेचन दिले नाही अथवा रुग्णाकडून नियमांचे पालन झाले नाही तर अनेक उपद्रव होण्याची शक्यता असते. त्यामुळे विरेचन चिकित्सा तज्ञ अनुभवी वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावी. विरेचन उपचार अजीर्ण झालेले, जुलाब झालेले, हृदयरोगी, गर्भिणी, बाल, वृध्द दुर्बल इ.ना देऊ नयेत.
विरेचन उपक्रम प्रामुख्याने पित्तदोष किंवा रक्ताच्या आजारांवर केला जातो. कफ व वात दोषांसाठी सुध्दा विशिष्ट औषधांच्या साह्याने हा उपक्रम करतात.
नस्य

औषधे देण्याचे विविध मार्ग आहेत. जरूरी प्रमाणे तोंडावाटे, गुदावाटे, नाकावाटे, कानावाटे देखील औषध द्यावे लागते. प्रामुख्याने मानेच्या वरच्या भागातील आजार कमी करण्यासाठी किंवा lत्या अवयवांच्याआरोग्यासाठी नाकावाटे औषध दिले जाते. त्याला ‘नस्य’ म्हणतात.
‘नस्य’ विशेषतः डोक्यातील – मस्तकातील आजार, इंद्रियांचे विकार बरे करण्यासाठी केले जाते. ‘नासा हि शिरसो द्वारम्’ अर्थात नाक हे मस्तकाचे द्वार आहे. त्यामुळे मस्तकातील आजारांवर प्रामुख्याने नाकातून औषध द्यावे लागते.
नस्यासाठी वेगवेगळी औषधे वापरुन कफ बाहेर काढणे, मस्तकातील वात – पित्त दोष कमी करणे तसेच कान-डोळे इत्यादी ज्ञानेद्रियाचे पोषण करणे किंवा मस्तकातील अवयवांची शक्ती वाढविणे असे विविध उद्देश साध्य करता येतात.
वनस्पतींचा ताजा रस, उदा. दूर्वा, माका इ. औषधी चूर्णे, धूरी, तेल, तूप, दूध, काढा अशा वेगवेगळ्या औषधांचा नस्यासाठी वापर व्यवहारात आश्यकतेनुसार केला जातो.
पावसाळ्याची सुरुवात, शरद ऋतु आणि वसंत ऋतु हे नस्यासाठी उत्तम ऋतु आहेत. त्याखेरीज ग्रीष्म ऋतुत दुपारच्या अगोदर व थंड ऋतुत दुपारी तसेच पावसाळ्यात ढग दाटलेले नसताना नस्य करावे. नस्य देताना वातावरण फार थंड, गरम, ढगाळलेले किंवा वारा असलेले नसावे.
नस्य देताना झोपवून रुग्णाच्या चेह-याला, मानेला खांद्यांना, डोक्याला तेल लावून हलका शेक द्यावा. डोके व मान किंचित खाली झुकवावी, जेणेकरुन नाकपुड्या व नाक सरळ वर दिसतील. नाकपुडीत औषध घालताना थेंब थेंब औषध सोडले जाते. प्रथम एका नाकपुडीत औषध घातल्यावर नाकाने श्वास घेऊन तोंडाने श्वास सोडावा. असा ५ ते ६ वेळा श्वासोच्छ्वास घेतला जातो. नस्यानंतर १०० अंक मोजेपर्यंत (साधारण ३ ते ४ मिनीट ) रुग्णास तसेच झोपण्यास सांगतात. नंतर हातपाय चोळले जातात. औषध घश्यात उतरल्यास ते थुंकून टाकावे., गिळू नये. ते पोटात गेल्यास भूक कमी होते. रुग्णाला नंतर आवश्यकतेनुसार धूरी किंवा गुळण्या करण्यास औषध दिले जाते.
नस्यानंतर कफ सूटून तो थुंकीवाटे बाहेर पडत असतो. नस्यानंतर बोलू नये. हसणे, रडणे, अंघोळ करणे, लगेच जेवण करणे अशा गोष्टी करु नयेत.
नस्याचा उपयोग विशेष करुन खालील आजारांमध्ये करतात.
डोके जड होणे, वास न येणे, सर्दी, पडसे, अर्धे डोके दुखणे, तोंडाला चव नसणे, नाकातून रक्त येणे, बेशुध्दी, चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, मानसिक आजार तसेच पक्षवध (अर्धांग वायू), अर्दित (तोंड वाकडे होणे) इ.
निरोगी माणसाने आपल्या दिनक्रमामध्ये नियमित करण्याचे जे नस्य आहे. त्यासाठी तेल वापरावे. नियमित करण्याचे नस्य २ -२ थेंबच करावे. त्याला प्रतिमर्श नस्य म्हणतात. नित्य नस्याने चेहरा, मान, खांदे, छाती, पुष्ट व भक्कम होतात. बुध्दी उत्तम कार्य करते. सर्व ज्ञानेंद्रिय उत्तम कार्ये करतात.
बस्ती

जेव्हा शिरेतून औषधे देण्याचा शोध लागला नव्हता त्यावेळी डॉक्टरमंडळी सुध्दा गुदमार्गाने औषधे देत असत. औषधे गुदमार्गाने देण्याची पध्दत आयुर्वेदात फार पूर्वीपासून होती. याला बस्ती चिकित्सा असे म्हणतात. ‘बस्ती’ याचा शब्दशः अर्थ मूत्राशय. बस्ती उपचार करताना पूर्वीच्या काळी प्राण्यांच्या विविध प्रक्रिया करून कमावलेल्या मूत्राशयाचा वापर फुग्यासारखा केला जात असे व त्याने बस्ती दिला जात असे त्यामुळे या उपचाराला बस्ती उपचार असे म्हणतात. सध्या मात्र उपलब्ध तंत्रज्ञानाने भिन्न भिन्न एनिमाची भांडी तसेच plastic paper bags चा देखील वापर केला जातो. बस्ती चिकित्सेत औषध केवळ गुदमार्गानेच दिले जात नाही तर ‘उत्तरबस्ती’ प्रकारात मूत्रमार्गावाटे, योनीमार्गावाटे देखील औषध दिले जाते.
बस्तीचिकित्सा ही प्रामुख्याने वातदोषाकरिता दिली जाते. बस्ती उपचारात दिलेले औषध पक्वाशयात जाते व तेथून ते सर्व शरीरावर परिणाम करते. पक्वाशय हे वात दोषाचे प्रमुख स्थान आहे. बस्तीमधील औषधे पक्वाशयात गेल्यानंतर सर्व शरीरातील दोष पक्वाशयात खेचून आणले जातात व त्यांना शरीराबाहेर काढले जाते. बस्तीचा प्रमुख वापर वातदोषाच्या आजारांसाठी केला जातो तरी सर्व दोषांच्या चिकित्सेत बस्तीचा वापर होतो. दूधाचे बस्ती पित्ताच्या आजारावर तर काढा, मध, क्षार, गोमूत्र इ.चे बस्ती कफदोषासाठी वापरले जातात. सर्व पंचकर्म उपक्रमांमध्ये बस्ती उपक्रमांमध्ये बस्ती उपक्रमाचा आवाका मोठा आहे. त्यामुळे त्याला ‘अर्धचिकित्सा’ असे म्हणतात. अर्थात् उरलेले सर्व चिकित्सा उपक्रम एका बाजूस व बस्ती चिकित्सा एका बाजूला. यावरुनच बस्तीचे महत्व स्पष्ट होते.
बस्तीमध्ये वापरण्यात येणा-या औषधी द्रव्यावरुन बस्तीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.1) निरुह बस्ती –
2) अनुवासन बस्ती –
निरुह बस्ती – या प्रकारच्या बस्तीमध्ये औषधी वनस्पतींचे काढे प्रामुख्याने असतात. त्याखेरीज सैंधव, मध, तेल व औषधीचूर्णेही असतात.
अनुवासन बस्ती – यात प्रामुख्याने तेलाचा – स्नेहाचा भाग असतो
बस्ती देण्यापूर्वी विशेषतः, निरुहबस्ती देण्यापूर्वी सर्व अंगाला स्नेहन स्वेदन केले जाते. त्याने दोष कोष्ठात (पोटात) उतरतात. रुग्णाच्या स्थितीनुसार अनुवासन बस्तीपूर्वी केवळ पोट व कंबर याठिकाणी तेल लावून शेक दिला तरी चालतो. बस्तीसाठीची पूर्वतयारी रुग्ण व रोगानुसार ठरवावी लागते. अनुवासन बस्ती म्हणजे तेलाचा बस्ती कांहीतरी खाऊन त्यानंतरच दिला जातो. निरुह म्हणजे काढ्याचा बस्ती रिकाम्यापोटी दिला जातो. बस्ती देताना रुग्णाला डाव्या कुशीवर झोपवून डावा पाय सरळ व उजवा पाय मुडपून पोटाशी घेण्यास सांगितले जाते. नंतर तेल लावून स्निग्ध केलेला कॅथेटर हळूहळू गुदभागातून आत सरकवला जातो व त्याद्वारे बस्तीचे औषध दिले जाते.
बस्ती दिल्यानंतर रुग्णाला थोडा वेळ पोटावर झोपण्यास सांगितले जाते. निरुह बस्ती दिल्यानंतर काही वेळाने तो परत बाहेर येणे आवश्यक असते. विशेषतः काढ्याचा बस्ती पाऊणतासामध्ये बाहेर येणे आवश्यक असते. बस्ती उपचार देखील तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखालीच घेणे आवश्यक ठरते. तेलाचा (अनुवासन) बस्ती मात्र ४५ मिनिटे कालावधी किंवा जास्त काळ पोटात राहिला की फलदायी ठरतो. क्वचित रुग्णांमध्ये शरीरातील खूप जास्त वातदोष व कोठयातील रूक्षपणामुळे सर्व तैल शरीर शोषून घेते. त्यामुळे फारसे तेल बाहेर पडत नाही.
बस्ती उपचार चालू असताना वाहनावरुन प्रवास करणे, जास्त प्रमाणात बोलणे, दिवसा झोपणे, व्यायाम करणे, शरीरसंबंध इ. गोष्टी टाळाव्यात. भोजन पचायला हलके, ताजे व शरीराला उपयोगी असे घ्यावे. हे सर्व नियम पाळल्याने बस्तीचा फायदा चांगला झालेला दिसून येतो. बस्ती उपचारात वापरण्यात येणा-या द्रव्यामध्ये वेगवेगळ्या औषधी वनस्पतीचे काढे, कल्क, तेल, तूप, वेगवेगळे क्षार वनस्पतींनी सिध्द केलेले दूध, सैंधव, मध, गोमूत्र इ. चा समावेश केला जातो. प्रत्येक द्रव्यानुसार बस्तीचे निरनिराळे उपयोग ठरतात.
बस्ती उपचार हा प्रामुख्याने वातविकारांवर उपयोगी पडतो. त्यामध्ये देखील हाडांच्या तसेच सांध्यांच्या वेगवेगळ्या आजारात बस्ती चिकित्सेने जास्त चांगला फायदा झालेला दिसून येतो. उदा. मानेच्या व कमरेच्या मणक्यांच्या आजारात ( मानेचा व कमरेचा स्पॉडिलोसिस, स्पॉडिलायटिस) ज्या विकारांत मणक्यांची झीज झालेली असते, रचनेमध्ये बदल झालेला असतो, अशा वातविकारांच्या अवस्थेत वेगवेगळ्या औषधी तेलांचा व तिक्तक्षीर बस्तींचा चांगला फायदा झालेला दिसून येतो. बस्तीमुळे हाडांची झीज भरुन निघते. मणक्यांना चिकटलेल्या स्नायु व नसांना बळ मिळते. त्यामुळे होणारी कंबरदुखी, मानपाठदुखी या तक्रारी कमी होतात. त्याबरोबरच भग्नामध्ये, भग्नानंतर (हाडांच्या फ्रॅक्चरनंतर) होणा-या तक्रारींमध्ये देखील बस्तींचा फायदा होतो.पक्षाघात (अर्धांगवायू), अर्दित (Facial Palsy), कुब्ज इ. वातविकारांमध्ये औषधांबरोबर बस्ती उपचार हाच मुख्य आहे. त्याकरिता औषधी तेलाचे व काढ्याचे बस्ती एका आड एक दिवस घेतल्याने रुग्णाच्या लक्षणांमध्ये खूप फरक पडलेला दिसून येतो. हातापायांतील स्नायुंची कार्यशक्ती वाढते. हालचाली पूर्ववत् होण्यास सुरुवात होते. वेगवेगळ्या सांध्यांच्या विकारात बस्ती उपचारासारखा दुसरा उत्तम उपचारच नाही असे म्हणायला हरकत नाही. सांध्याच्या आजारात पोटातून घेतल्या जाण-या औषंधाबरोबर वेगवेगळे शेक व बस्ती उपचार घेतला असता अधिक फायदा झालेला दिसून येतो. पचन विकारातील अतिशय किचकट व जुनाट विकार म्हणजे ग्रहणी अर्थात ज्यात अन्न नीट न पचता अर्धे पक्व अर्धे कच्चे अन्नकण मलावटे बाहेर पडतात. या विकारात पचनशक्ती सुधारणा-या औषधांबरोबरच वेगवेगळ्या तेलांचे / काढ्यांचे / दूधाचे बस्ती उपयुक्त ठरतात. वारंवार शौचाला जावे लागणे, कुंथावेसे वाटणे, वारंवार कफयुक्त चिकट मलप्रवृत्ती यासारखी लक्षणे असणा-या प्रवाहिका विकारात पिच्छाबस्ती खूप उपयुक्त ठरतात. अनेक मोठ्यामोठ्या आजारातून क्षीणता, दुर्बलता आली असेल तर बल, मांस यांची वाढ करण्याकरिता यापन बस्ती दिले जातात. यामध्ये औषधी काढ्याबरोबर दूध, मांसरस, मध, तूप इ.चा उपयोग करतात. या बस्तीमुळे आयुष्याचे यापन (आयुष्य टिकविणे) होते. स्थौल्य, मेदोधातू कमी करण्याकरीता लेखन बस्ती उपयोगी पडतात. बस्ती देण्याच्या संख्येवरुन कर्मबस्ती (३०), कालबस्ती (१६) आणि योगबस्ती (८) असे बस्तीचे प्रकार पडतात. रोगाप्रमाणे स्वस्थ अवस्थेत देखील बस्ती उपक्रम ब-याच ठिकाणी केला जातो. विशेषतः जेव्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला वातदोषाचा प्रकोप होतो. तेव्हा सर्व निरोगी व्यक्तींनी देखील बस्तीची चिकित्सा घ्यावी. गर्भिणींनी नववा महिना सुरु झाल्यावर प्राकृत प्रसवासाठी तेलाचे बस्ती घ्यावेत. अपत्याची इच्छा असणा-या जोडप्यांनाही बीजपुष्टी व स्वस्थ संततीसाठी, गर्भधारणेपूर्वी बस्ती उपक्रम करुन घ्यावा.
उत्तरबस्ती
उत्तरबस्ती हा पंचकर्मातील ‘बस्ती’ या उपचाराचाच एक प्रकार आहे. नेहमीचा बस्ती हा गुदमार्गाने दिला जातो. तर उत्तरबस्ती हा पुरुषांमध्ये मूत्रमार्गाने व स्त्रियांमध्ये मूत्रमार्गाने व गर्भाशयामध्ये म्हणजे योनीमार्गाने दिला जातो. उत्तरबस्तीकरिता औषधी सिध्द तेल, तूप व्याधीनुसार वापरली जातात. वेगवेगळ्या मूत्रमार्गाच्या विकारात, मूत्रासंबंधी तक्रारीत उत्तरबस्ती देतात. उदा. लघवीला अडखळत होणे, मूत्राशयात मूत्र खूप वेळ साठून राहणे, मूत्रप्रवृत्तीच्यावेळी खूप वेदना होणे, मूत्रमार्गाची आग/खाज होणे, मूत्राचे प्रमाण कमी होणे, सरक्त मूत्र जाणे, मूत्राश्मरी या सर्व तक्रारीत उत्तरबस्ती देतात. याशिवाय पुरुषांमध्ये शुक्रधातुसंबंधीत तक्रारी( शुक्रजंतूचे प्रमाण खूप कमी असणे, शुक्रजंतुची हालचाल कमी असणे इ.समस्या) यात उत्तरबस्तींचा चांगला उपयोग होतो. याबरोबर पोटातून वाजीकरण औषधे घेतली असता चांगला फायदा होतो. स्त्रियांच्या विविध योनीविकारांमध्ये, रजोदोषांमध्ये अनियमित मासिक स्राव, रक्तप्रदर, गर्भाशयभ्रंश (गर्भाशय स्वतःच्या जागेवरुन सरकून थोडे खाली येणे) इ. विकारात उत्तरबस्ती दिले जातात. स्त्रियांच्या जीवनात मातृत्व हा सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय व महत्वाचा टप्पा असतो. अनियमित रजःप्रवृत्ती, स्त्रीबीज योग्यवेळी पक्व होऊन न फुटणे, योनीविकार (वारंवार गर्भस्त्राव/गर्भपात होणे) गर्भाशयाचा आकार लहान असणे इ. अनेक कारणांनी वंध्यत्व ही समस्या निर्माण होते. अशा रुग्णांमध्ये प्रथम वमनविरेचन किंवा बस्ति उपचारांनी शरीरशुध्दी केली जाते व त्यानंतर ‘उत्तरबस्ती’ हा उपचार केला जातो. ब-याचवेळा उत्तरबस्तीच्या पूर्वी ‘योनीधावन’ ही क्रिया करतात. यासाठी वेगवेगळ्या औषधी काढ्यांचा उपयोग केला जातो. मासिक रजस्त्राव थांबल्यानंतर म्हणजे साधारण ४थ्या/५ व्या दिवसापासून पुढील ३/५ दिवस उत्तरबस्ती चिकित्सा दिली जाते. उत्तरबस्तीनंतर योनीमार्गात पिचू ठेवला जातो( पिचू म्हणजे औषधीतेल, तूप यात बूडवून ठेवलेली कापसाची घडी). धावन, उत्तरबस्ती, पिचूधारण इ. उपचारांनी गर्भाशयादि जनन अवयवांचे कार्य सुधारुन गर्भधारणा होण्यास मदत होते. उत्तरबस्ती उपचाराकरिता वापरली जाणारी सर्व उपकरणे, औषधे योग्य प्रकारे निर्जंतुक करुनच शुध्द स्वरुपात काळजी पूर्वक वापरली जातात. त्यामुळे उपद्रवाची शक्यता कमी असते. हा उपचार तज्ञ, अनुभवी वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करुन घ्यावा. सध्या मोठ्या प्रमाणात आढळणा-या Ovarian cyst या विकारात औषधी उपचारांबरोबरच उत्तरबस्ती घेतल्यास चांगला फायदा होतो. अशाप्रकारे ‘उत्तरबस्ती’ ही नावाप्रमाणेच श्रेष्ठ चिकित्सा आहे.
रक्तमोक्षण
